आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे: वंचित बहुजन आघाडीची मागणी
ढाणकी,२१: संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या जल्लोेषात मश्गुल असताना, राजस्थानच्या जालौर जिल्ह्यातील सुराणा गावात आठ वर्षीय निरागस मागासवर्गीय मुलगा इंद्र देवराम मेघवाल याने तहान लागल्याने शाळेतील माठातील पाणी पिले.त्यामुळे त्या शाळेतील जातीयवादी विकृत मानसिकता असलेल्या छैलसिंह नावाच्या मुख्याध्यापकाने त्या कोवळ्या मुलाला केवळ दलित असल्याच्या कारणाने, माठाचे पाणी पिले म्हणून निर्दयपणे बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
या माणुसकीला काळीमा फासणार्या घटनेच्या निषेधार्थ ढाणकी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वंचित बहुजन आघाडीने निषेध सभा घेऊन आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, पीडित कुटुंबाला तत्काळ एक कोटी रुपयांची मदत देऊन या कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरीत सामील करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. राजस्थानमध्ये दलित आदिवासी यांच्यावर होणार्या अन्याय अत्याचाराच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे सरकार बरखास्त करावे, अशा मागणीचे निवेदन बिटरगाव पोलिस ठाणेदार प्रताप भोस यांच्यामार्फत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव जॉन्टी विणकरे, ढाणकीचे नगरसेवक संबोधी गायकवाड, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शहर प्रमुख शुभम गायकवाड, श्याम राऊत, सुनील राऊत, राहुल विनकरे, विष्णू वाडेकर, आकाश गायकवाड, सिद्धार्थ गायकवाड, अनिकेत सावतकर, अभिजित गाडेकर, रूपेश गायकवाड यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.