पोराला वाचवण्यासाठी बाप पुराला भिडला; तापाने फणफणलेल्या मुलाला कडेवर घेऊन पुरातून मार्ग काढला!

चक्रव्यूह न्यूज नेटवर्क: शिवाजी शिंदे

दि.१४: चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील ५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे वर्धा, वैनगंगा नदीला पूर आला आहे. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.

महाराष्ट्राच्या शेवटचा टोकावर असलेले पोडसा हे गाव वर्धा नदीचा काठावर वसलं आहे. पुराचा फटका बसलेल्या पोडसा गावातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे पोडसा गावाला बेटाचं स्वरूप आलं आहे. अशातच गावातील श्यामराव पत्रुजी गिनघरे यांचा मुलगा कार्तिक याला ताप आला होता. तापाने तो फणफणत होता. मात्र गावात आरोग्य सुविधा नाही. दुसरीकडे शेजारच्या गावाला जाणारे मार्ग पुराने वेढलेले. पण शेवटी बाप तो बापच. मुलाचा जीव वाचवण्यासाठी त्याला खांद्यावर घेत पत्रुजी गिनघरे यांनी पुराच्या पाण्यातून मार्ग काढत शेजारचं गाव गाठलं.

पोडसा गावापासून ५ ते ६ कि.मी. अंतरावर वेडगाव गाव आहे. तेथे खासगी डॉक्टर आहेत. या ठिकाणी कार्तिकवर उपचार करण्यात आले आणि पुन्हा पत्रुजी गिनघरे हे धो-धो बरसणाऱ्या पावसातून मार्ग काढत घरी पोहोचले. मुलाच्या उपचारासाठी घेतलेल्या या कष्टामुळे पत्रुजी गिनघरे यांच्यावर कौतुकाचा वर्षावर केला जात आहे. तर दुसरीकडे या घटनेमुळे पुन्हा एकदा आपल्या आरोग्य व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!