भाजप पुणे जिल्हाध्यक्षांचा हर्षवर्धन पाटील यांनाअप्रत्यक्ष जोरदार टोला!इथून पुढच्या काळात कोणी पिंडीवरचा विंचू होता कामा नये, याची काळजी घेतली पाहिजे’
इंदापूर( प्रतिनिधी):इंदापूर भाजपाच्या जिल्हा बैठकीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी “हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेसमध्ये असुरक्षित वाटत होतं, म्हणून त्यांनी भाजपचा आधार घेतला; मात्र आता ते गेल्याने इंदापुरातून भाजप संपली असे नाही. इथून पुढच्या काळात कोणी पिंडीवरचा विंचू होता कामा नये, याची काळजी भाजपच्या वतीने भविष्यकाळात घेऊ.
मागील पन्नास वर्षांपासून राजकारणात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकारण हे अत्यंत विश्वासघातकी आहे. “
अशा शब्दांमध्ये भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत सोमवार (ता.०७) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात ते प्रवेश करत आहेत.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी इंदापुर येथील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी (ता.०६) रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना काळे म्हणाले, ज्या – त्या स्थानिक परिस्थितीनुसार काहीजण पक्ष प्रवेशाचा निर्णय घेत असतात. राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे सरकार असताना सत्तेमधील पक्ष फुटले ही देशाच्या इतिहासातील पहिली घटना होती.तसेच, मागील दोन दिवसापासून तालुक्यातील अनेक बडे नेते, कार्यकर्ते आपल्याच असल्याचे त्यांनी सांगितले. काहींनी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करत गाठी -भेटी देखील घेतल्या आहेत. तेही भाजपच्या वाटेवर असल्याचेही श्री.काळे यांनी यावेळी सांगितले.
याशिवाय तालुक्यात भाजपचे प्रभावी अस्तित्व असुन येणारा काळ जरी आव्हानात्मक असला तरी राजकीय स्थितंतराने होत असतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गर्भगळीत होता कामा नये. जिल्ह्यात दहा पैकी चार जागा भाजपने लढवाव्यात अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केलेली आहे. यामध्ये इंदापूरची जागा देखील भाजपला मिळावी असा आमचा आग्रह राहील. मात्र महायुतीने कोणत्याही पक्षाचा उमेदवार दिला तर त्याचे काम पक्ष करेल. असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.
यामुळे इंदापूर तालुका आणि शहर ग्रामीण भाजपच्या तालुका पदाधिकारी व जिल्हास्तरावरील पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी बरखास्त करत असल्याची घोषणा करीत येत्या आठ दिवसांमध्ये नवीन रचना केली जाईल असे वासुदेव काळे यांनी स्पष्ट केले.