डॉ.आंबेडकरांनी लिहलेले संविधान जगात आदर्श – हर्षवर्धन पाटील
इंदापूर : प्रतिनिधी दि.२६/११/२३
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात आदर्श असलेल्या भारतीय संविधानाची निर्मिती केली. त्यामुळे भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही असणारा देश म्हणून आज आदराने ओळखला जात आहे. संविधानानुसार देशाचे लोकशाही पद्धतीने कामकाज केले जात आहे. परिणामी, भारत देश जगात महासत्ता म्हणून उदयास येत आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.२६) काढले.
भिगवण येथे बौध्द विहारांमध्ये अमर बौध्द युवक संघटनेच्या वतीने संविधान दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते.
ते पुढे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा निरक्षरता, गरीबी असे अनेक प्रश्न समाजामध्ये होते. त्यामुळे स्वातंत्र्य टिकविणे व लोकशाही रुजविणे हे खऱ्या अर्थाने देशासमोर आव्हान होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील मुसदा समितीकडून तयार झालेल्या भारतीय संविधानामुळे देशामध्ये लोकशाहीचा पाया मजबुत झाला आहे.
न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर राज्यघटनेमुळे देशामध्ये समता प्रस्थापित होण्यास मदत झाली. देशातील श्रीमंत व्यक्तीला एक मत व सर्वसामान्य व्यक्तींलाही एकच मत हे भारतीय राज्यघटनेचे यश आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने केवळ उद्देशिकेचे वाचन न करता संपुर्ण संविधानचा अभ्यास तरुण पिढीने केला पाहिजे, असे आवाहनही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(आठवले गट) पुणे जिल्हाध्यक्ष विक्रम शेलार होते. पोलिस उपनिरीक्षक रुपेश कदम, बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे, प्रा. तुषार क्षीरसागर, तानाजी वायसे, जावेद शेख, दादासाहेब थोरात, बाळासाहेब शेलार, रोहित शेलार, सत्यवान भोसले, प्रशांत वाघ, अमर धवडे, गुराप्पा पवार, अमर बौध्द युवक संघनटेचे अध्यक्ष अमोल कांबळे आदी उपस्थित होते.
यावेळी देवानंद शेलार यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. प्रास्ताविक अमोल कांबळे यांनी तर आभार विक्रम शेलार यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन संघर्ष धेंडे, पप्पु लोंढे, अजय शेलार, प्रेम भोसले किरण कांबळे व पदाधिकाऱ्यांनी केले.
बौध्द विहाराच्या विकासासाठी निधी देऊ- हर्षवर्धन पाटील
भिगवण येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेला बौध्द विहारामध्ये केवळ भिगवण येथीलच नव्हे तर परिसरातील लोक धार्मिक व सामाजिक कार्यासाठी येतात. या ठिकाणी आणखी सुविधांची आवश्यकता आहेत. त्यामुळे बौध्द विहाराच्या विकासासाठी आवश्यक निधी देऊ, अशी ग्वाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली.