डॉ. उषा भोईटे पवार यांचे अनुभूतींचे धागे दिल्लीत प्रकाशित
इंदापूर (प्रतिनिधी):शिवाजी शिंदे
दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लुमेवाडी येथे कार्यरत असलेल्या निमगाव केतकीच्या डॉ. उषा भोईटे पवार यांच्या अनुभुतींचे धागे या ललित साहित्याचे प्रकाशन अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य व साहित्यिक राजन लाखे यांच्या हस्ते २२ फेब्रुवारी २०२५ रोजी झाला. यावेळी मंचावर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे रविंद्र बेडकिहाळ , अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे सदस्य डॉ. मनोज वराडे, गोमंतक साहित्य मंडळ गोवाचे कोषाध्यक्ष राजमोहन शेट्ये, आणि दिल्ली अखिल भारतीय साहित्य संमेलन काव्यकट्टा समन्वयक गोपाळ कांबळे हे उपस्थित होते.
डॉ. उषा भोईटे पवार यांचे पहिलेच पुस्तक राजधानी दिल्लीत प्रकाशित झाले ही इंदापूर साठी अभिमानाची बाब आहे.त्यांचे हे पुस्तक शब्द शिवार प्रकाशनने प्रकाशित केले असून काजवाकार पोपट काळे यांनी प्रस्तावना दिली आहे. आजवर प्रकाशित व अप्रकाशित लेखांचा संग्रह म्हणजे अनुभुतींचे धागे हा ललित संग्रह आहे. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा असा काहीसा अनुभव या निमित्ताने आल्याचे डॉ. भोईटे यांनी सांगितले. या साहित्य संमेलनात बी.बी. सी. न्युज यांनी देखील डॉ. भोईटे यांना संमेलनाध्यक्ष डॉ.ताराबाई भवाळकर यांच्या भाषणाविषयी मत विचारले. अतिशय उत्साहात आणि दर्जेदार असे साहित्य संमेलन राजधानी दिल्ली येथे पार पडले.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कवी,साहित्यीक, रसिक या साहित्य संमेलनासाठी आले होते. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले,स्वागताध्यक्ष पद्मविभूषण शरद पवार तर संमेलनाध्यक्ष डॉ. ताराबाई भवाळकर या होत्या.
७१ वर्षांनंतर राजधानी दिल्ली येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले. याच साहित्य संमेलनात पहिलेच पुस्तक प्रकाशित होण्याचा मान इंदापूर तालुक्यातील डॉ. उषा भोईटे यांना मिळाला असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सध्या त्या लुमेवाडी येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.इंदापुर तालुक्यातील डाॅक्टरेट मिळविलेल्या प्रथम प्राथमिक शिक्षिका आहेत.आदिवासी शाळांतील मुलांसाठी त्यांनी अभ्यासक्रम करून दिलेबद्दल मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले होते.त्यांचे आजवर अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्या लेखिका, कवयित्री,व्याख्याता, इतिहास संशोधक आहेत.