महाराष्ट्र धर्माची विचार मुल्ये भागवत धर्मातूनच आली.. सचिन पवार

इंदापूर (प्रतिनिधी):छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले.महाराष्ट्र धर्म वाढवला.महाराष्ट्र धर्माची विचार मूल्ये ही भागवत धर्मातून छत्रपती शिवाजी मिळाली असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते सचिन पवार यांनी केले.

इंदापूर शहर शिवजयंती उत्सव समिती आयोजित १५व्या वर्षातील मालोजीराजे व्याख्यानमालेत “संत परंपरा आणि छत्रपती शिवराय” या विषयावर सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी त्यांनी द्वितीय पुष्प गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरेकर माऊली फडाचे प्रमुख ह.भ.प.श्रीगुरु हरिदास बोराटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव मखरे,अनिकेत वाघ,गफूरभाई सय्यद,इंजिनिअर सोमनाथ गवळी उपस्थित होते.

     यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की भोसले कुळाचा उत्कर्ष हा मालोजीराजांच्या काळामध्ये झाला. शेख मोहम्मद महाराज हे मालोजीराजांचे गुरु होते.अहमदनगर येथील सुफी संत शहाशरीफ दर्ग्यावरून मालोजीराजे यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी ठेवली होती.धार्मिक सहिष्णुता ही मालोजीराजांपासूनच पुढे भोसले कुळामध्ये स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ते शाहू महाराज यांचे पर्यंत वाढत राहिली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कामामागे संतांचे विचार होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची अगदी लहान वयातच जगद्गुरु तुकाराम महाराज यांची भेट झाली होती. तुकाराम महाराज यांनी मावळ खोऱ्यात स्वराज्याचे सहकारी, लढवय्ये स्वामीनिष्ठ मावळे किर्तनातून तयार केले.संत तुकाराम गाथेमध्ये पाईकीच्या अभंगात याचा उल्लेख आढळून येतो. गनिमी कावा याविषयीची विचार मुल्ये गाथेत आढळून येतात. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ,संत तुकाराम यांनी वर्णाभिमान कमी करून संत परंपरेत जातव्यवस्था नष्ट केली. जात व्यवस्थेला पूर्वी राजाचे पाठबळ असायचे ते राजाचे पाठबळ छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात नष्ट केले.ज्ञानेश्वरांनी संस्कृत भाषा प्राकृत मध्ये आणली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहारात फारशी शब्द कमी करून मराठी प्राकृत भाषा वापरात आणली. संत ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली तर शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्यात लोकशाही निर्माण केल्याची माहिती सचिन पवार यांनी दिली.

   सुत्रसंचालन इंदापूर शहर शिवजयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष शरद झोळ यांनी केले. स्वागत मालोजीराजे व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष कैलास कदम ,सुनील गलांडे,दीपक साळुंखे, अमोल साठे ,योगेश गुंडेकर, अमोल खराडे,विशाल गलांडे,अनिकेत साठे,ओम जगताप ,यांनी केले तर आभार रघुनाथ पन्हाळकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!