प्रशासनाने खरीप हंगामाचे व्यवस्थित नियोजन करावे-माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
इंदापूर :यंदाचा रब्बी हंगाम शेतकरी बांधवांसाठी म्हणावा तेवढा फलदायी ठरला नाही.निसर्गाच्या लहरी वातावरणामुळे या हंगामातील अनेक पिके उध्वस्त झाली असल्याने,तसेच कांदा सारखे हमखास पैसे देणारे नगदी पिक कवडमोल दराने विक्री झाल्याने शेतकरी बांधव अडचणीत आला आहे.अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आधार देणे महत्वाचे असुन प्रशासनाने खरिप हंगामाचे व्यवस्थित नियोजन करून बियाणे, खते,औषधे वेळेवर उपलब्ध करून देण्याच्या सूचना माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या आहेत. आज पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती,कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम 2023 ची आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात आमदार दत्तात्रय भरणे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते.या प्रसंगी राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष अमोल भिसे,गटविकास अधिकारी विजयकुमार परिट,पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राम शिंदे,लोणी देवकरचे सरपंच कालिदास देवकर, अगोती नं.1 चे सरपंच चांगदेव ढुके, युवा नेते संदेश देवकर,सचिन सपकळ,कृषी अधिकारी रुपनवर साहेब तसेच तालुक्यातील कृषी सहाय्यक,कृषी अधिकारी,कृषी सेवक पुरस्कार प्राप्त शेतकरी तसेच विविध गावचे सरपंच-उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या बैठकीदरम्यान खरीप हंगामाचा आढावा घेत असताना आमदार दत्तात्रय भरणे विविध फळांची तसेच पिकांची माहिती घेतली.याविषयी बोलताना ते म्हणाले की,यंदाचा रब्बी हंगाम तसा अडचणीचाच झाला आहे.सुरवातीच्या काळात प्रचंड पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामातील अनेक पिक सुरवातीलाच नष्ट झाली होती,त्यामुळे शेतक-यांना दुबार पेरणी करावी लागली,ऊसा सारख्या पिकाची अतिपावसामुळे योग्य वाढ न झाल्याने टनेजला फटका बसला होता तर महावितरण विभागाने सक्तीच्या वीज बिलासाठी जवळपास 2 महिने विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे हातातोंडाशी आलेल्या केळी,द्राक्ष,पेरू,डाळींब या सारख्या पिकांना पाण्याचा ताण बसला.यातूनही मार्ग काढत शेतकऱ्यांनी प्रचंड ओढाताण करत या फळबागा जगवल्या ख-या,परंतु काढणीच्या अखेरच्या टप्प्यात अचानक आलेल्या वादळी पावसामुळे तसेच विविध नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेली पिके उध्वस्त होताना आपण पाहिलेले आहे.त्यामुळे आता ख-या अर्थाने शेतकऱ्यांना आधार देणे महत्वाचे असून सर्वांनी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सुचना आमदार भरणे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.तसेच इंदापूर तालुक्यातील कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने विविध फळ पिकात, पालेभाजी पिकात किंवा कडधान्य पिकात ज्यांनी ज्यांनी उत्कृष्ट काम रून भरघोस उत्पादन घेतले आहे,अशा प्रगतशील शेतकऱ्यांना आमदार दत्तात्रय भरणे यांच्याहस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.